लातूर, दि. २१ (प्रतिनिधी) :लातूर जिल्ह्यातील अत्याधुनिक साखर कारखाना ट्वेन्टीवन शुगर्स लि., मळवटी यांनी २०२५-२६ या गाळप हंगामासाठी ऊसदर जाहीर केला आहे. या हंगामात शेतकऱ्यांना प्रतिटन रु. ३१५१/- दराने ऊसाचा मोबदला मिळणार असून, गेल्या हंगामात म्हणजेच २०२४-२५ मध्ये हा दर रु. ३००१/- होता. “गोडवा मेहनतीचा, प्रकाश प्रगतीचा!” या घोषवाक्याखाली ट्वेन्टीवन शुगर्सने दीपावलीच्या शुभेच्छा देत शेतकऱ्यांच्या विकासाचा नवा संकल्प जाहीर केला आहे. लातूरचा हा आधुनिक साखर कारखाना फक्त साखर उत्पादनापुरता मर्यादित नसून हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात “स्थैर्य, समृद्धी आणि आनंदाचा गोडवा” निर्माण करत आहे, असे संदेशात म्हटले आहे. दरम्यान, बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ २०२५ गुरुवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता मळवटी येथील कारखाना परिसरात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला कारखान्याचे पदाधिकारी, शेतकरी, कामगार व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे ट्वेन्टीवन शुगर्स लि., मळवटी, ता. लातूर यांच्याकडून सांगण्यात आले.


