लातूर : लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि शिवसेना (उबाटा गट) यांच्या वतीने मध्यवर्ती बस स्थानकातून पूर्वीप्रमाणेच पुणे-मुंबईसाठी 55 बस फेऱ्या त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी न मानल्यास 25 सप्टेंबर 2025 पासून लातूर विभाग नियंत्रक कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मध्यवर्ती बस स्थानक हे मुरुड व परिसरातील प्रवाशांसाठी सोयीस्कर असून सर्व सुविधा उपलब्ध आहेत. तरीही पुणे-मुंबईच्या 55 बस फेऱ्या रेणापूर नाका येथील स्थानकातून सोडल्या जात असल्याने विद्यार्थ्यांना, महिला प्रवाशांना व जेष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात अनेक वेळा लोकप्रतिनिधीमार्फत पत्रव्यवहार व पाठपुरावा करूनही अद्याप बस फेऱ्यांचे मध्यवर्ती स्थानकातून संचालन सुरू झालेले नाही, अशी खंत व्यक्त करण्यात आली.
यासंदर्भात 2 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत तवले, तालुकाध्यक्ष बक्तावर बागवान, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष श्रीकांत मगर, सतीश मिसाळ, अक्षय चव्हाण, मोहित डोळसे, मोहित काळुंखे, डी. उमाकांत उपस्थित होते.




