अहमदपूर (प्रतिनिधी) : मोबाईल आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे वाचनसंस्कृती कमी होत चालली आहे. ही स्थिती बदलण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, राज्यातील २०० पेक्षा जास्त विद्यार्थीसंख्या असलेल्या सर्व शाळांमध्ये स्वतंत्र वाचनालय आणि ग्रंथालय सुरू करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत आठवड्यातील दोन तास विद्यार्थ्यांना वाचनासाठी राखून ठेवले जाणार आहेत. वाचन हा आता अभ्यासक्रमाचा भाग मानला जाणार असून कथा, विज्ञानविषयक पुस्तके, चरित्रे, संदर्भग्रंथ यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची विचारशक्ती आणि सर्जनशीलता वाढवण्याचा उद्देश आहे.
यशवंत विद्यालय, अहमदपूरचे ग्रंथपाल निरज रामलिंग मुळे म्हणाले, “समग्र विकासाचा मार्ग ग्रंथालयातूनच जातो. समाज प्रगत करायचा असेल, तर वाचनसंस्कृती रुजवणे अत्यावश्यक आहे. शासनाचा हा उपक्रम ही खरी सामाजिक गुंतवणूक आहे.”
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांबरोबरच समाजात पुन्हा एकदा वाचनाची गोडी निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




