उदगीर / प्रतिनिधी तालुक्यातील निडेबन येथील अंगणवाडी क्रमांक एक ते पाच येथे राष्ट्रीय पोषण महा २०२५ अंतर्गत पोषण अभियानाचा समारोप कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. अध्यक्षस्थानी मानवी हक्क अभियान मराठवाड्याचे प्रसिद्धीप्रमुख अर्जुनराव जाधव होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून दामिनी पथक प्रमुख तथा वाहतूक पोलीस हेडकॉन्स्टेबल सोनाली ढगे, ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य बालासाहेब शिंदे, बचत गटाच्या सीआरपीओ सौ. कविता राठोड आणि ज्येष्ठ कार्यकर्ते व्यंकटराव कोदळिकर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे सोनाली ढगे यांनी दामिनी पथकाचे कार्य, तसेच मुलींना “गुड टच” आणि “बॅड टच” या विषयांवर मार्गदर्शन केले. बालासाहेब शिंदे यांनी सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.० या एकात्मिक पोषण सहाय्य कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करताना सांगितले की, या उपक्रमाद्वारे मुले, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांमधील कुपोषण कमी करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. आरोग्यवर्धक जीवनशैली आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्न हे पोषण अभियानाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मदतनीस यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात गरोदर मातांना पोषण आहाराने ओटी भरून देण्यात आली तसेच सहा महिन्यांच्या बालकांना पूरक आहाराचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक चंचला शिवाजीराव हुगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्योती करकरे यांनी मानले.


