उदगीर, प्रतिनिधी :
नववर्षाच्या स्वागतासाठी केवळ उत्सव न साजरा करता समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देत देवर्जनच्या श्रीराम प्रतिष्ठानतर्फे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उदगीर येथील ऐतिहासिक उदगीर किल्ला परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
या उपक्रमाची सुरुवात उदागीर बाबांचे आशीर्वाद घेऊन करण्यात आली. त्यानंतर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी किल्ला परिसरात साचलेला प्लास्टिक कचरा, बाटल्या, कागद व इतर अस्वच्छ घटक गोळा करून परिसर स्वच्छ केला. या श्रमदानामुळे किल्ल्याचे ऐतिहासिक सौंदर्य अधिक खुलून आले.
नववर्ष हे केवळ आनंद व उत्सवाचे प्रतीक नसून समाजासाठी सकारात्मक योगदान देण्याची संधी आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. तसेच ऐतिहासिक वारसा जपणे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे आणि सामाजिक बांधिलकी जोपासणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.
या श्रमदानात नागराज बुरांडे, नितीन नांदुरे, आनंद कुसळकर, विशाल वाडीकर, ऋषी श्रीवास्तव, बालाजी वाडेकर, हनुमंत देवकर, ओमकार कांबळे, दिनेश करवंदे, अनिल दंडे व गोपाळ दंडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.


